हंसराज,भंडारा पवनी :- पवनी-कोरंभी-खाक्षी-ठाणा-गोसेखुर्द या महत्त्वाच्या मार्गाच्या दुरवस्थेविरोधात आणि नियमित एसटी बससेवेसाठी विदर्भ युवा क्रांती संघटनेने पुकारलेल्या प्रदीर्घ आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हर्षल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष दीपक सिंग टाक यांच्या समर्थ नेतृत्वाखाली स्थानिक युवकांनी हा लढा यशस्वीरीत्या दिला. या मार्गावर गोसेखुर्द धरण, अभयारण्य आणि पावर प्लांटमुळे वर्षभर मोठी रहदारी असते, परंतु रेती घाटांमधील बेसुमार अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती.
प्रशासनाने आता रस्ता नूतनीकरण आणि नियमित बसफेऱ्या सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. या विजयामुळे परिसरातील विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, रस्ता तयार झाल्यानंतर पुन्हा अवजड रेती वाहतुकीमुळे रस्ता खराब झाल्यास थेट रेती घाटांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा संघटनेने दिला आहे. हा विजय म्हणजे स्थानिक युवकांच्या अभेद्य एकजुटीचा आणि सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्याचा मोठा विजय असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत असून आता प्रशासनाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीकडे परिसरातील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.





