spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

उबाठांनी केलेला हिंदुत्वाचा सौदा मतदार विसरलेले नाहीत

– महापालिका निवडणुकांमध्ये उबाठा, राज ठाकरेंचा भ्रमाचा भोपळा फुटेल

– भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई :- हिरव्या मतांसाठी उबाठांनी हिंदुत्वाचा सौदा केला हे जनता विसरलेली नाही. त्यामुळे विधानसभा, नगरपालिका निवडणुकांनंतर महापालिका निवडणुकीत उबाठा गटाला पश्चातापाची वेळ येणार आहे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि राज्यात केलेल्या विकासकार्यांमुळे मुंबईकर आगामी पालिका निवडणुकीत उबाठा आणि राज ठाकरेंच्या भ्रमाचा भोपळा फोडतील, असा विश्वासही बन यांनी व्यक्त केला.

स्वत:वर शेकले की मूग गिळून गप्प बसायचे आणि भाजपावर यथेच्छ बिनबुडाचे आरोप करत डंका पिटायचा असे सोईस्कर गलिच्छ राजकारण उबाठाचे खा. संजय राऊत करत आहेत अशी प्रखर टीका बन यांनी केली. ‘उबाठां’ चा मित्रपक्षांच्या पोटात खंजीर खुपसण्याचा इतिहास, जनतेची लूट केल्याचे कर्म, स्वत:च्या भावाला घराबाहेर काढल्याचे कृत्य, साधुमहंतांची हत्या, खिचडी घोटाळा, पत्राचाळ घोटाळ्यातून मराठी माणसाला देशोधडीला लावणे, कोविडमध्ये गडप केलेला मलिदा याबद्दल आता राऊतांनी बोलायलाच हवे असे आव्हानही बन यांनी दिले. मुंबईतील मेट्रोचे जाळे, कोस्टल रोड, अटल सेतु या आणि इतर विकासकामांमधून भाजपा करून दाखवते, यावर राऊतांनी ही बोलयाला हवे असा टोमणा बन यांनी लगावला.

देशात लोकशाही सुरक्षित-उबाठा गटात लोकशाही धोक्यात

उबाठा गटामध्ये लोकशाही धोक्यात असून नगर पालिका निवडणुकांमध्ये ज्यांनी कार्यकर्त्यांना बेवारस सोडले होते तेच राऊत आणि उबाठा गट आता कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत, हे हास्यास्पद असल्याची टीका करत बन यांनी सांगितले की, सामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक असलेल्या नगर पालिका, नगर पंचायत निवडणुकीमध्ये उबाठा, राऊतांनी कार्यकर्त्यांना वा-यावर सोडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या सर्व नेत्यांनी मात्र महाराष्ट्राच्या कानाकोप-यात जाऊन, केलेल्या विकासकामांची ब्ल्यू-प्रिंट मतदारांसमोर मांडली.

मनसे- उबाठा मध्ये मतभेद आणि मनभेद

उद्धव-राज ठाकरे यांच्यात प्रचंड प्रमाणात मतभेद, मनभेद आहेत हे महाराष्ट्राने बघितलेले आहे. त्यामुळे राऊतांनी एकत्रीकरणाच्या कितीही गर्जना केल्या तरीही राज ठाकरे यांनी उबाठांपासून सावध राहायला हवे. उद्धव यांची धोका देण्याची परंपरा आहे, असा इशाराही बन यांनी दिला.

ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना भाजपाची शिस्त, प्रथा, परंपरा माहिती आहे. मुनगंटीवार यांच्या मनात काही नाराजी असेल तर आमचे वरिष्ठ नेतृत्व दूर करेल असा विश्वास बन यांनी व्यक्त केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.