– वाढीव रुपये ५० हजार अनुदानापासून वंचित
सचिन चौरसिया,रामटेक :- महाराष्ट्र शासनाने घरकुल योजने अंतर्गत अनुदानामध्ये ५० हजार रुपयांची वाढ जाहीर केली असताना, २०२२-२३ मध्ये मंजूर झालेल्या आणि २०२५-२६ मध्ये निधी वितरित झालेल्या अनेक लाभार्थ्यांना या वाढीव अनुदानापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप ग्रामपंचायत पंचाळा (बु.) येथील उपसरपंच योगेश म्हात्रे यांनी केला आहे. यासंदर्भात नुकतेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती रामटेक यांना निवेदन देऊन घरकुल लाभार्थ्यांना ५० हजार रुपये वाढीव अनुदान देण्याची मागणी करण्यात आली.
घरकुल लाभार्थ्यांमध्ये प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असून, ‘जर घरकुल २०२२-२३ मध्ये मंजूर झाले होते, तर त्यावेळीच निधी वितरित का करण्यात आला नाही?’ असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाच्या विलंबामुळे अनेक गरीब कुटुंबांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागली असून, आता वाढीव अनुदान नाकारले जात असल्याने लाभार्थ्यांमध्ये आर्थिक अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. सध्या वाढलेल्या बांधकाम साहित्याच्या किमतींमुळे घरकुल पूर्ण करणे अनेक लाभार्थ्यांसाठी कठीण बनले आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेले वाढीव ५० हजार रुपयांचे अनुदान सर्व पात्र लाभार्थ्यांना लागू करावे, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. विशेषतः २०२२-२३ मध्ये मंजूर आणि २०२५-२६ मध्ये निधी वितरित झालेल्या लाभार्थ्यांना समान न्याय देण्यात यावा, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने या गंभीर विषयाची तात्काळ दखल घेतली नाही, तर घरकुल लाभार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
‘गरीब आणि सर्वसामान्य घरकुल लाभार्थ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही. शासनाने जाहीर केलेला लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्याला मिळालाच पाहिजे. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.’
– योगेश मात्रे (उपसरपंच, पंचांळा बु./ अध्यक्ष, भाजप रामटेक मंडळ)