सावनेर २८ : दरवर्षी २८ जुलै रोजी साजरा होणारा जागतिक निसर्ग संवर्धन दिन सावनेर येथील भालेराव विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना पथकाने संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करून साजरा केला.
यावेळी विभागप्रमुख प्रा. विलास डोईफोडे यांनी निसर्ग संवर्धनाचे महत्त्व विषद केले. ते म्हणाले की, संपूर्ण जग सध्या वातावरण बदलाचे दुष्परिणाम भोगत आहे. जागतिक तापमान वाढ, प्रदूषण आणि जैवविविधतेचा ऱ्हास यामुळे पर्यावरण, शेती आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत.
प्रा. डोईफोडे यांनी यावर जोर दिला की केवळ शासनानेच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाने नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्यास पुढील पिढी सुखी आणि समाधानी राहील. त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, पावसाळ्यात प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याची योग्य काळजी घ्यावी.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. चंद्रशेखर पोटोडे, विलास सोहगपुरे आणि अनेक विद्यार्थी उपस्थित होते.




