नागपूर १८ : नागपूर मेट्रोने तब्बल १० कोटी प्रवासी वाहून नेत एक ऐतिहासिक टप्पा पार केला असून, ही केवळ एक आकडेवारी नसून शहराच्या आधुनिकतेच्या दिशेने झालेल्या महत्त्वपूर्ण वाटचालीचे प्रतीक आहे. मार्च २०१९ मध्ये मर्यादित वेळेत सुरू झालेली नागपूर मेट्रो सेवा हळूहळू नागपूरकरांच्या विश्वासास पात्र ठरली आणि शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनली. दरवर्षी प्रवाशांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून, २०१८-१९ मध्ये फक्त ५५,००० प्रवासी असलेल्या सेवेने २०२४-२५ मध्ये ३.१६ कोटी प्रवासी संख्या गाठली आहे. कोविड महामारीच्या काळातही सेवा सुरू ठेवत नागपूर मेट्रोने आपली बांधिलकी जपली. विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी ३०% सूट, ₹१०० मध्ये अमर्याद प्रवास पास अशा सवलतीमुळे आज मेट्रो प्रवाशांपैकी २०% हिस्सा विद्यार्थ्यांचा आहे, ज्यामुळे लहान वयातच सार्वजनिक वाहतूक संस्कृतीला चालना मिळाली. दिव्यांगांसाठी रॅम्प, लिफ्ट, टॅक्टाइल पाथ आणि आरक्षित आसनांसह सुलभता प्रदान करण्यात आली आहे, ज्यामुळे ही सेवा सर्वसमावेशक ठरली आहे. मेट्रोच्या वापरामुळे खाजगी वाहनांचा वापर कमी झाला असून, ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानामुळे कार्बन उत्सर्जनातही घट झाली आहे. नागपूर मेट्रो केवळ शहरवासीयांसाठी वाहतूक व्यवस्था पुरवणारी यंत्रणा न राहता, एकस्मार्ट, पर्यावरणपूरक आणि समावेशक नागरी जीवनशैलीचा भाग बनली आहे. यामुळे नागपूर मेट्रोचा हा यशस्वी प्रवास इतर शहरी भागांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, शाश्वत, विश्वासार्ह आणि आधुनिक सार्वजनिक परिवहन प्रणालीचे आदर्श उदाहरण निर्माण करत आहे.




