हंसराज, भंडारा :- लग्नसमारंभातील अनाठाई खर्च टाळून गरीब कुटुंबांना कर्जबाजारीपणातून मुक्त करण्याच्या उद्देशाने, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीचे औचित्य साधून गणेशपूर (भंडारा) येथे १७ वा निशुल्क सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. एकलव्य सेना सामाजिक संघटना व प्रयत्न बहुउद्देशीय संस्था, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने ३० एप्रिल रोजी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
विवाहासाठी होणारा अवाढव्य खर्च आणि त्यामुळे निर्माण होणारी आर्थिक समस्या यावर मात करण्यासाठी गेल्या १७ वर्षांपासून हा उपक्रम अविरतपणे राबविला जात आहे. या सोहळ्याचे उद्घाटन टेकचंद मार्ग यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयोजक संजय केवट होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजू कारेमोरे, विजय बोरकर, अविनाश साखरे, रमाकांत दीक्षित, अनिल बहादुरे, यागत खान, डॉ. मेश्राम, गडबडे भुरे, कीर्ती गंभीर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविकात संजय केवट यांनी
या उपक्रमामागची भूमिका मांडली. तसेच, वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेता, पुढच्या वर्षीचा विवाह सोहळा सायंकाळच्या सत्रात आयोजित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे, विवाहबद्ध झालेल्या नववधूंना आयोजन समिती आणि दिनबंधू शिक्षण व सामाजिक संस्था, नागपूर यांच्या वतीने संसारोपयोगी भांडी व इतर साहित्य भेट म्हणून देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धर्मेंद्र बडोले, मनोज चौबे, गणेश मेश्राम, शाहीर मेश्राम, रवि के, नरेंद्र सातके, रमेश वाघमारे, योगेश भुरे यांच्यासह प्रातःकालीन मित्र मंडळ, चैतन्य ग्राउंड गणेशपूर, गुरुदेव सेवा मंडळ, दिव्यांग मित्र मंडळ, महागौरी व योग समिती आणि एकलव्य सेनेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. या कौतुकास्पद उपक्रमाचे संपूर्ण जिल्ह्यातून स्वागत होत आहे.

