नागपूर प्रतिनिधी ता ३ – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकीय नेते आणि धार्मिक कार्यांबद्दल एक महत्त्वाचे विधान केले आहे. नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘जो लोकांना मूर्ख बनवतो तोच सर्वोत्तम नेता बनतो’ असे म्हटले आहे. गडकरी त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात आणि त्यांच्या या विधानाने सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
नागपूरमधील अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या कार्यक्रमात गडकरींनी हा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, मंत्री आणि नेत्यांना धार्मिक कार्यांपासून दूर ठेवले पाहिजे. धर्माच्या नावाखाली राजकारण करणे समाजासाठी हानिकारक आहे. राजकारणी जिथे जिथे जातात, तिथे आग लावल्याशिवाय निघत नाहीत. जर धर्माची सत्ता राजकारण्यांच्या हातात दिली तर समाजाचे मोठे नुकसान होईल, असेही त्यांनी सांगितले.
‘माझ्या क्षेत्रात सत्य बोलणे निषिद्ध आहे’
गडकरींनी यावेळी शॉर्टकट आणि प्रामाणिकपणाबद्दलही आपले विचार मांडले. ते म्हणाले, “कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी शॉर्टकटचा वापर केला जातो, पण त्याचे दुष्परिणाम होतात. शॉर्टकटमुळे व्यक्ती ध्येयापासून दूर जाते. त्यामुळे प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि सत्यता ही मूल्ये खूप महत्त्वाची आहेत.”
राजकारणाबद्दल बोलताना ते म्हणाले, “मी ज्या क्षेत्रात (राजकारणात) काम करतो, तिथे मनापासून सत्य बोलणे निषिद्ध आहे. जो लोकांना मूर्ख बनवू शकतो, तोच सर्वोत्तम नेता बनतो.” त्यांनी हेही स्पष्ट केले की प्रत्येक क्षेत्रात जीवनाचे मूल्य महत्त्वाचे असते आणि सत्य व अहिंसेची भावना प्रबळ असली पाहिजे.




