– जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार
नागपूर :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला साक्षीदार होण्यासह देशाने विविध क्षेत्रात साध्य केलेल्या अलौकीक यशाची अनुभूती आपण सर्वांनी घेतली आहे. प्रगतीच्या या पाऊल खुणांना समजून घेतांना देश, समाजमन व वास्तवाचे भान समजून घेणे आवश्यक आहे. वाचन हा यासाठी महत्वाचा पाया असून प्रत्येकाने दररोज किमान कोणत्याही पुस्तकातील एक पान वाचून त्याची अनुभूती घेतली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय येथे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ऐ.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचक प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. श्रीकांत गोडबोले, माजी वरिष्ठ संचालक तरुण श्रीवास्तव, माजी वरिष्ठ सहसंचालक सी.एस. ठवळे, तांत्रिक सहाय्यक माला राठोड व विद्यार्थी उपस्थित होते.
शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केलेल्या वाचनातून शैक्षणिक गुणवत्तेच्या जवळ जाता येईल परंतु जीवन जगण्याच्या गुणवत्तेला संपादन करण्यासाठी विविध लेखकांचे साहित्याचे वाचन आवश्यक ठरते, असे विनोद रापतवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले. सर्वच क्षेत्रात आयटीचा मुक्त संचार हा माणसाला दूर लोटणारा ठरता आहे. यामुळे प्रत्येक ठिकाणी मानवी संवाद तुटल्या जात आहे. ही पोकळी पुस्तके भरून काढतात. यादृष्टीने प्रत्येकाने वाचनाकडे वळले पाहिजे, अशी अपेक्षा श्रीकांत गोडबोले यांनी व्यक्त केली. यावेळी तरुण श्रीवास्तव व सी.एस.ठवळे यांनी युवकांशी संवाद साधला.




