यवतमाळ :- इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना निर्देश देण्यात आले आहेत की, भारत सरकारच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनेंतर्गत प्रलंबित असलेले सर्व अर्ज तातडीने निकाली काढावेत.
जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क मंजुरीसाठीचे अर्ज मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. सदर अर्ज वर्षनिहाय पुढीलप्रमाणे प्रलंबित आहेत. २०१९-२०२० : १८२ अर्ज, २०२०-२०२१ : २१८ अर्ज,२०२१-२०२२ : २१९ अर्ज,२०२२-२०२३ : २८२ अर्ज,२०२३-२०२४ : २७४ अर्ज,२०२४-२०२५ : १५५६ अर्ज,२०२५-२०२६ : ५८५० अर्ज,प्रलंबित आहे. विभागाने स्पष्ट केले आहे की, संबंधित सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मंजुरीसाठी महाविद्यालयांनी त्वरीत सादर करावेत. अन्यथा विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील. तसेच विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेता येणार नाही, याचीही सूचना देण्यात आली आहे.
महाविद्यालयांनी प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य सूचना देण्यासाठी शाळांमध्ये नोटिसा प्रसिद्ध करणे, सूचना फलकावर माहिती लावणे, विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअॅप गट तयार करणे आणि नोडल अधिकारी (समन्वय अधिकारी) नेमणे या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, यवतमाळ यांनी नमूद केले आहे की, “ऑनलाईन आणि ऑफलाईन बैठकांद्वारे अनेक वेळा सूचना देण्यात आल्या असूनही काही महाविद्यालयांनी गांभीर्याने कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहात आहेत. त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी तत्काळ कार्यवाही करून प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, यांच्या वतीने करण्यात आले आहे.




