यवतमाळ :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ जि.प. उच्च प्राथमिक केंद्र शाळा, लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने १४ नोव्हेंबर रोजी “बालक दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार नागेश वि. न्हावकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिपक एच. दाभाडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी भूषविले. प्रमुख उपस्थितीत केंद्रप्रमुख जया झळके, मुख्याध्यापिका मिना सांगडे तर प्रमुख वक्त्या म्हणून पॅनल वकील छाया मुळे उपस्थित होत्या.
प्रमुख वक्त्या छाया मुळे यांनी बालकांचे हक्क, शिक्षणाचा, संरक्षणाचा, विकासाचा व जगण्याचा हक्क याबाबत सविस्तर माहिती दिली. “देशाचे भवितव्य बालकांवर अवलंबून असते, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे” असे प्रतिपादन त्यांनी केले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात दिपक दाभाडे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करत संविधानातील मुलांना मिळणारे अधिकार सोप्या भाषेत समजावून सांगितले. कोणतेही बालक आपल्या अधिकारापासून वंचित राहू नये यावर त्यांनी भर दिला. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी वानखडे यांनी केले तर आभारप्रदर्शन कुळसंगे शिक्षक यांनी केले. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




