– छत्रपती महोत्सवात सन्मान
यवतमाळ :- आपल्या अष्टपैलू बुद्धिमत्तेने आणि नेतृत्वाने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव उज्ज्वल करणारी यवतमाळ येथील हिरा राखी देशमुख हिला शिवजयंती निमित्त आयोजित छत्रपती महोत्सवात ‘विशेष सर्वोत्कृष्ट युवा पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. माजी मंत्री माणिकराव ठाकरे आणि राजा ठाकरे यांच्या हस्ते हिराला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हिरा सध्या यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता अकरावतीत विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत तिने कोणत्याही विषयाची खाजगी शिकवणी न लावता घवघवीत यश संपादन केले. दहावीच्या परीक्षेत तिने मराठी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून आपल्या भाषिक क्षमतेची मोहोर उमटवली. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी हिराने महाभारत, भगवद्गीता, बायबल आणि कुराण यांसारख्या ग्रंथांचे सखोल वाचन पूर्ण केले आहे. यासोबतच तिला विज्ञान, मायथॉलॉजी, वास्तुशास्त्र आणि अध्यात्म अशा विविध विषयांत विशेष रुची आहे. तिने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित कविता लेखन करून आपली सर्जनशीलता सिद्ध केली आहे.
व्हिएतनाममध्ये नुकत्याच पार पडलेल्या ७ व्या आंतरराष्ट्रीय युवा शिखर संमेलनात तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. तिच्या प्रकल्पाला तेथे ‘मोस्ट सस्टेनेबल प्रोजेक्ट अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय नागपूर येथील ‘मॉडेल युनायटेड नेशन’ स्पर्धेतही तिने ‘बेस्ट व्हर्बल मेंशन’ पुरस्कार पटकावला आहे. तिच्या या कर्तृत्वाची दखल घेत छत्रपती महोत्सवात हिरा हिला सर्वोत्कृष्ट युवा पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.




