चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त अकुनुरी नरेश यांनी महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. शहरातील नागरी सुविधांमध्ये सुधारणा करून नागरिकांना दर्जेदार सेवा वेळेत उपलब्ध करून देणे हा महानगरपालिकेचा मुख्य उद्देश असून त्या दृष्टीने ही आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीत शहरातील स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, सार्वजनिक आरोग्य सेवा, नागरी सुविधा तसेच विविध विकासकामांची सद्यस्थिती यांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित कामांना प्राधान्य देत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी विभाग प्रमुखांना दिल्या.
नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करून त्या कमी करण्यासाठी विभागांमध्ये अधिक समन्वय साधण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. तसेच शहरातील विकासकामांना गती देत नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व सुविधा-संपन्न वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका सातत्याने कार्यरत असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय राखून कामकाज अधिक गतिमान व्हावे यासाठी दर सोमवारी अशा प्रकारची आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या बैठकीस उपायुक्त शेषराव टाले, मुख्य लेखाधिकारी मनोज गोस्वामी,शहर अभियंता रवींद्र हजारे तसेच महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.