यवतमाळ :- महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६” अंतर्गत यवतमाळ येथील केमिस्ट भवन येथे जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली.
या कार्यशाळेत पूर परिस्थितीत घ्यावयाच्या उपाययोजना, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने टीडीआरएफ चे संचालक तथा शासनाचे अधिकृत आपत्ती व्यवस्थापन मास्टर ट्रेनर हरिश्चंद्र बद्रीनाथ राठोड यांनी प्रमुख प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश राठोड यांनी प्रास्ताविक केले. आपल्या मार्गदर्शनात हरिश्चंद्र राठोड यांनी “आजूबाजूचे संभाव्य धोके ओळखून योग्य पूर्वतयारी केल्यास आपत्तीची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी करता येते. प्रशिक्षणाचा प्रभावी वापर केल्यास आपण स्वतःचा तसेच इतरांचा जीव वाचवू शकतो. एक प्रशिक्षित व्यक्ती किमान दहा लोकांचे जीव वाचवू शकतो असे सांगितले.
घरातील वापरात नसलेल्या वस्तूंपासून तात्पुरते बचाव साहित्य कसे तयार करता येते, याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. प्रशिक्षणात आपत्ती काळातील तत्परता, समन्वय व सुरक्षितता यावर विशेष भर देण्यात आला.
या कार्यक्रमास पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता मिलिंद बोरोले, उपविभागीय अभियंता वाईलकर, जनसंपर्क व प्रशिक्षण अधिकारी अभिषेक राजहंस, कार्यालय अधीक्षक सुनील महल्ले, शाहिद सैय्यद, संजीवनी पवार तसेच जलसंपदा विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव आगाशे यांनी केले.

