– दोघे किरकोळ जखमी
सचिन चौरसिया, रामटेक :- भरधाव येणारी कार अनियंत्रित होऊन माहुली-मनसर मार्गावर सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास थेट पेंच जलाशयाच्या कालव्यात कोसळली. शनिवार (दि.३०) मे रोजी घडली असून या अपघातात दोघेजण किरकोळ जखमी झाले आहे.
माहितीनुसार एमएच ३१-जीए ५२७० कार माहुली कडून मनसर कडे जात होती. ४ वाजताच्या सुमारास मार्गावरील धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कार रस्त्याच्या कडेला जाऊन थेट कालव्यात पलटली. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते गुड्डू चौधरी आणि ग्रामपंचायत सदस्य बंटी जयस्वाल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कालव्यात उतरून कारमधील अडकलेल्या दोघांना सुरक्षित बाहेर काढले. अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपचारार्थ रुग्णालयात हलविले. या अपघातात कोणतीही जीवहानी झाली नसून मोठी दुर्घटना टळली. या घटनेने माहुली- मनसर मार्गावरील धोकादायक वळणाच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुरक्षितेच्या अपुऱ्या उपाययोजनेमुळे अपघातांची शक्यता कायम आहे. प्रशासनाने तातडीने आवश्यक उपायोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.



