मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांची सीओसीला भेट
नागपूर, ता. ३० : नागरिकांची प्रत्येक तक्रार ही महत्वाची आहे. आपल्या तक्रारी करिता नागरिकांनी केलेला प्रत्येक कॉल हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. अशात आपले संभाषण हे नागरिकांशी अधिक सौहार्दपूर्ण असणे अपेक्षित आहे. तरी कॉल सेंटरवर आलेल्या कॉलचे उत्तर देताना नागरिकांशी अधिक सौहार्दपूर्ण संभाषणावर भर द्यावा अशी सूचना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (ता.29) मनपा मुख्यालयातील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर (सीओसी) ला भेट दिली. याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., माहिती व तंत्रज्ञान विभागाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम, माहिती तंत्रज्ञान अधिकारी स्वप्नील लोखंडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, कमलेश जंजाळ, राज चौधरी, . अनिकेत आटे, धम्मरत्न तिरपुडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मनपा आयक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी तक्रार निवारण हेल्पलाईनसाठी कार्यरत कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन केले. नागरिकांच्या तक्रारींवर योग्य कार्यवाही होण्याकरिता तक्रार निवारण हेल्पलाईन यंत्रणेमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, सूचनांचे काटेकोर पालन करावे, आवश्यक असल्यास प्रशिक्षणाची सोय देखील केली जाईल असे मनपा आयक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी सांगितले.तसेच मनपा आयुक्त यांनी निर्देश दिले कि, नागरिकांद्वारा प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे निराकारण योग्य पध्दतीने झाल्याबाबत संबंधीत विभागाचे विभाग प्रमुखांना खात्री पटवून घ्यावी व ज्या कर्मचारी/ अधिकारी द्वारा तक्रारीचे निराकारण योग्य पध्दतीने न करता तक्रारीचे निराकारण झाल्याचे दर्शविल्यास अशा कर्मचारी/ अधिकारी यांचेकडून स्पष्टीकरण सादर करून घ्यावे.
मनपाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम यांच्या नेतृत्वात मनपाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग आणि व्हीआयपीएलद्वारे कॉल सेंटर कर्मचाऱ्यांसाठीचे सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण शनिवारी सीओसी सेंटरमध्ये पार पडले, त्यानंतर मंगळवारी आयुक्तांनी केंद्राला भेट देऊन मार्गदर्शन केले. याशिवाय ‘ई-ऑफिस’ करिता मनपाच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्याही सूचना आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिल्या.




