नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प हा केवळ उत्पन्न-खर्चाचा ताळेबंद नसून विकसित नागपूरच्या दूरदृष्टीचा आराखडा असल्याचे प्रतिपादन भाजपाचे नगरसेवक रितेश गावंडे यांनी केले. अर्थसंकल्पावरील अभिनंदन प्रस्तावावर बोलताना त्यांनी स्थायी समितीच्या सभापती शिवानी दानी-वखरे यांचे अभिनंदन केले.
गावंडे म्हणाले की, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मोठा झाल्यामुळे विकास झाला नाही, तर गेल्या बारा वर्षांत झालेल्या सर्वांगीण विकासामुळे महापालिकेची आर्थिक क्षमता वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वामुळे नागपूरमध्ये हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक, राष्ट्रीय संस्था, उद्योग, रस्ते, आरोग्य व शैक्षणिक सुविधा उभ्या राहिल्याने शहराची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे.
एम्स, आयआयएम, आयआयआयटी, मिहान, नाग नदी पुनरुज्जीवन, नवीन नागपूर बिझनेस डिस्ट्रिक्ट, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्रातील विविध प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांनी या विकासामुळे महापालिकेच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाल्याचे सांगितले.
यावेळी त्यांनी अर्थसंकल्पातील महिलांसाठी ७५ नवीन सार्वजनिक प्रसाधनगृहे, ‘महापौर हसरे स्मित’, ‘महापौर माहेर’, ‘कर्करोगमुक्त नागपूर’ आणि पर्यटन विकासासारख्या लोकाभिमुख योजनांचेही स्वागत केले. विकास, सामाजिक बांधिलकी आणि आर्थिक शिस्त यांचा उत्तम समन्वय साधणाऱ्या या अर्थसंकल्पाला आपण संपूर्ण पाठिंबा देत असल्याचे गावंडे यांनी स्पष्ट केले.




