– ६०० कोटींचा थकीत निधी त्वरित द्या, अन्यथा ‘वर्षा’वर धडकणार; जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांचा सरकारला इशारा
हंसराज,भंडारा :- महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही निव्वळ ‘फसवी’ असल्याची टीका करत, सरसकट कर्जमुक्ती आणि रब्बी हंगामातील धान खरेदीचे थकीत ६०० कोटी रुपये त्वरित देण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आज रस्त्यावर उतरला. जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी भंडारा शहरात भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
“७/१२ कोरा करा, हीच खरी कर्जमुक्ती” निवडणूक काळात सरकारने कोणत्याही अटी-शर्तीशिवाय सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात ही कर्जमाफी नसून कर्ज वसुली मोहीम सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच ज्याप्रमाणे दोन लाखांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ केले होते, त्याच धर्तीवर सध्याच्या सरकारनेही निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करावा, अशी आग्रही मागणी संजय रेहपाडे यांनी यावेळी केली.
धान उत्पादक शेतकरी संकटात; ६०० कोटी अद्याप थकीत रब्बी हंगामातील उन्हाळी धानाचे जवळपास ८०० कोटी रुपये शासनाकडे देणे होते. त्यापैकी केवळ २०० कोटी रुपये देण्यात आले असून ६०० कोटी रुपये अद्यापही थकीत आहेत. खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकऱ्यांना खते आणि बियाण्यांसाठी पैशांची नितांत गरज आहे. अशा वेळी हक्काचे पैसे न देणे हा शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रकार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच, पीक विमा कंपन्यांना कोट्यवधींचा नफा मिळवून देण्यासाठी सरकार ‘महापाप’ करत असून शेतकऱ्यांच्या पदरात मात्र दोन-तीन अंकी तुटपुंजी मदत पडत असल्याची टीकाही करण्यात आली.
मुंबईत ‘वर्षा’ बंगल्यावर धडकणार! “नको अटी, नको शर्ती, आम्हाला पाहिजे कर्जमुक्ती”, “धाण्याचे चुकारे लवकर द्या” अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. प्रशासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास आगामी काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने थेट मुंबईतील ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर मोर्चा नेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती सर्किट हाऊस येथून निघालेल्या या मोर्चात जिल्हा समन्वय सुधाकर कारेमोरे, उपजिल्हाप्रमुख किशोर तलमले, किशोर चन्ने, प्रकाश पारधी, तालुकाप्रमुख तिलक सार्वे, प्रमोद मेश्राम, दिनेश नंदापुरे, मधु बुराडे, युवासेना जिल्हा अधिकारी श्रीकांत मेश्राम, विधानसभा संघटक शोभाराम तिजारे, शहरप्रमुख राकेश आग्रे, प्रवीण गुप्ता, अरविंद अंबादे, विनायक सरोदे, देवानंद निमजे, गोवर्धन मारवाडे, मयूर जोशी, प्रशांत देशमुख, राजेश ठवकर, प्रकाश गव्हाणे, प्रकाश निनावे, दलिराम भुते, राज वधवानी, अजय बावणे, संजय झंजाळ, भास्कर बेदरकर, योगराज कागदे, उत्तम चचाने, सत्यनारायण कामथे, लखन दमाहे, श्रीराम इलपाते, सचिन ठावकर, उमेश कहालकर, मदन सयाम, प्रवीण गायधने, निखिल कुंभारे,विशाल भुरे, निलेश चामट, प्रमोद गाढवे, श्रीकांत घुगुसकर, रोहन आगरे, राहुल ईश्वरकर, अभिषेक सपाटे, मुकेश मोहनकर, रामलाल वरखडे, अरविंद भुरे, शेखर वाघमारे, मनोज भूरे, ढेकर पटले, वीरेंद्र मेश्राम, चंद्रशेखर वाघमारे, शिवराज सुरणकर, पुरुषोत्तम शेंडे, अतुल मिरासे, शैलेश खोब्रागडे, निवृत्ती गभणे, हिमांशू भाजीपाले, रोहित बनसोड, छत्रपाल चौधरी, राजू लांजेवार, मीताराम जीभकाटे, शामराव मालखंडाळे, चित्रागंध सेलोकर, गोपीचंद गोमासे, सुशील बावणे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.




