– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार
मुंबई :- पुणे एक्प्रेस वेवरील कनेक्टिंग लिंकचा बोगदा कोसळला नव्हता तर या बोगद्याजवळ एक दरड कोसळली होती. ती तातडीने हटवून कनेक्टिंग लिंक पूर्ववत करण्यासाठी फक्त १८ तास लागले. संजय राऊत, तुमच्यासारखा भ्रष्टाचार करणे, कंत्राटदारांकडून पैसे घेणे, मातोश्री 2 बांधणे हे आमचे धंदे नाहीत. आम्ही मेवा न खाता लोकांची सेवा करतो. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. महाराष्ट्राचे कनेक्टिंग सुधारण्याचे काम भाजपा आणि महायुती करेल. मुंबई – पुणे पुन्हा कनेक्ट झाले, पण तुम्ही आणि तुमचा पक्ष जनतेने मिसिंग केला आहे, त्याकडे पहा, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला.
कनेक्टिंग लिंकची फाईल तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सही न करता ठेवून दिली होती, याचा जनाब संजय राऊत आणि काँग्रेसला अभिमान वाटतोय. ज्याची लाज वाटायला पाहिजे, तीच बाब ते अभिमानाने सांगताहेत. पूर्वी या प्रकल्पासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी आडकाठी घातली होती, हे वास्तव आहे. परंतु हा प्रकल्प सुरू झाल्याने मुंबई – पुणे प्रवास अडीच तासात पूर्ण होतो. पूर्वी याच प्रवासासाठी चार-चार, पाच-पाच तास लागायचे. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हा कनेक्टिंग लिंक पूर्ण झाला. ते तुमच्यासारखे फाईल रोखणारे, प्रकल्पांमध्ये खोडा घालणारे नाहीत तर प्रकल्प पूर्ण करून जनतेसाठी सुविधा निर्माण करणारे मुख्यमंत्री आहेत, अशा शब्दात बन यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला.
महाराष्ट्रात इन्फ्रामॅन कोण आणि घरकोंबडा कोण आहे, हे राज्यातील जनतेला नीट माहीत असल्याचे सांगत बन म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कनेक्टिंग लिंक, अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो असे विविध पायाभूत प्रकल्प उभे केले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना साधी वीटही तुम्ही रचली नाही. मेट्रो प्रकल्पात खोडा घातला. कोस्टल रोडलाही विरोध करण्याचे काम तुमच्याच सरकारने केले. देवाभाऊ इन्फ्रामॅन असल्यानेच जनतेने त्यांना तीनदा निवडून दिले आहे. तुमचे मुख्यमंत्री घरात बसून फेसबुकवर लाईव्ह देत होते. त्यामुळे घरात बसणाऱ्यांना पुन्हा घरात बसवण्याचे कामही जनतेने केले.
संजय राऊत यांनी कुंभमेळ्याची चिंता करू नये, तुम्ही इज्तेमाची चिंता करा. कुंभमेळ्याची चिंता करण्यासाठी हिंदू बांधव सजग आहेत. राज्य सरकार पूर्ण ताकदीने हिंदू बांधवांना एकत्र आणण्यासाठी कुंभमेळ्याचे भव्य आयोजन करते. हिंदू एकत्रित येत असल्यामुळे, संजय राऊत, तुमचे पोट दुखतेय. तुम्हाला माहित आहे की कुंभमेळ्यात हिंदू एकत्र येतील, मग आपल्या दाढ्या कुरवाळण्याचे काम बंद होईल. कुंभमेळ्याची चिंता करण्यासाठी गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत, असे बन यांनी सुनावले .




