– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचे प्रतिपादन
– ‘तुकडे तुकडे गँग’कडून आपला गैरवापर होतो आहे हे तरुणाईच्या लक्षात आले
पाखंडीपणा करत विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कलम 370 पुन्हा लागू करण्याची मागणी करत देशविरोधी भूमिका घ्यायची, प्रेमानंद महाराज पाखंडी आहेत म्हणत त्यांना शिव्या द्यायच्या, असे प्रकार जंतर-मंतरवर करण्यात आले. आपला गैरवापर केला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर सोनम वांगचुक यांनीही आपले उपोषण मागे घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी शुक्रवारी पुन्हा केलेल्या आवाहनाचा व्हिडिओ जगभरातील सर्वाधिक लोकांनी पाहिला. देशाच्या तरुणांचे आयडॉल असलेल्या पंतप्रधानांच्या पाठीशी जेन-झी खंबीरपणे उभी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यानिमित्ताने देशात अराजकता निर्माण करणाऱ्या ‘तुकडे तुकडे गँग’ची पार पोलखोल झाली असल्याचे भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी अधोरेखित केले. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राऊत, प्रत्येक बाबतीत अपयश शोधायचे एव्हढेच तुम्हाला माहित आहे. पेपर फुटल्यानंतर सगळ्यांना अटक करण्यात आली. मात्र आताच्या कायद्यात दंड आकारणी आणि अधिक शिक्षेची तरतूद नसल्याने सरकार त्यात सुधारणा करते आहे, त्याला तुमचा आक्षेप का आहे? तुम्हाला त्याचे काय दुःख आहे? कारण तुमचा अजेंडा हा पेपरफुटीला शिक्षा झाली पाहिजे, हा नाहीच. तुमचा अजेंडा भारतात अराजकता पसरवायची, देशविरोधी भूमिका घेत हे सरकार पाडण्याचा आहे. तुमचा अजेंडा काय आहे, हे देशातील जनतेला माहित आहे, असे बन यांनी सुनावले.
सोशल मीडिया चालवायला, देश चालवायला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा तसेच महाराष्ट्रात देवेंद्रफडणवीस सक्षम असल्याचे सांगत बन पुढे म्हणाले, संजय राऊत, तुमचा इन्स्टाग्राम आणि तुमचा पक्ष हॅक झाला आहे. तुम्ही हिंदुत्व, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आणि जनतेलाही सोडले. तुमच्या पक्षाचा पासवर्ड आधी हिंदुत्व होता, आता तो पासवर्ड औरंगजेब फॅन क्लब असा झाला आहे. कलम 370 हटवण्याचे काम अख्ख्या काँग्रेसला जमले नाही ते अमित शहा यांनी एका दिवसात करून दाखवले. काँग्रेसच्या काळात काश्मीरमध्ये दगडफेक करणारे लोक होते. आज काश्मीरमध्ये पर्यटक प्रचंड संख्येने येत आहेत. तुम्हीही दोन महिन्यांपूर्वी काश्मीरमध्ये जाऊन नंदनवन असा श्रीनगरचा उल्लेख केला होता. संपूर्णपणे बदललेला काश्मीर पाहायला मिळत आहे. आधी आपल्या पक्षाचे दुकान वाजले आहे त्याच्याकडे लक्ष द्या, अशा शब्दात बन यांनी त्यांना फटकारले.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याबद्दल संजय राऊत अतिशय वाईट शब्द वापरतात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. महिलांचा सन्मान आणि संजय राऊत यांचा काहीही संबंध नाही. याआधीही त्यांनी स्वप्ना पाटकर यांना कशा पद्धतीने शिवीगाळ केली होती, हे महाराष्ट्राने पाहिले आहे. तुम्ही महिलांचा, लाडक्या बहिणींचा कायम अपमान केला. अशा पद्धतीने वारंवार महिलांचा अपमान करणार असाल तर महिला तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असे बन म्हणाले.
मनसेच्या धमक्यांना घाबरणार नाही
काही मनसेचे भाडोत्री तट्टू शुक्रवारी माझ्या सोसायटीबाहेर येऊन घोषणाबाजी करून गेले. माझे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. निजामांविरोधात लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकाचा मी नातू आहे. तुम्ही कितीही घोषणाबाजी केली, आरडाओरडा केला तरी मनसैनिकांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. आम्ही निजामांना घाबरलो नाही, त्यांच्या बंदुकीच्या गोळ्यांना घाबरलो नाही. तुमच्यासारख्यांच्या घोषणाबाजीला काय घाबरणार?, असे बन यांनी फटकारले.





