गडचिरोली :- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात 29 जुलै ते 12 ऑगस्ट २०२६ या कालावधीत जमावबंदी आदेश लागू केले आहेत.
जिल्ह्यात विविध ठिकाणी विनापरवानगी थोर महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण होत असल्याने सामाजिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या आदेशानुसार शस्त्रे, दाहक अथवा स्फोटक पदार्थ बाळगणे, आक्षेपार्ह घोषणा, प्रक्षोभक भाषणे, फलक अथवा प्रतिमांचे प्रदर्शन यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी किंवा संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतीही मिरवणूक, सार्वजनिक कार्यक्रम किंवा पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा सार्वजनिक ठिकाणी जमाव करण्यास मनाई करण्यात आली आहे. सदर आदेश 29 जुलै २०२६ रोजी मध्यरात्रीपासून 12 ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात लागू राहणार असल्याचे जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे.





