– मनपाच्या 37 कर्मचाऱ्यांना दिला निरोप
नागपूर :- मनपाच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या 37 कर्मचार्यांचा निरोप समारंभ (ता. 31) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समितीच्या सभागृहात पार पडला. अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता मनोज तालेवार होते. यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ. सौरभ कावळे, शिक्षण अधिकारी वंदना महाजन व जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी प्रामुख्याने उपस्थित होते.
अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता मनोज सिंग, वैद्यकीय अधिकारी दिपंकर भिवगडे, उपअभियंता संजय इंगळे, मुख्याध्यापिका मरियमबी शमसुन्निसा हफीज कलह यांच्यासह मनपाच्या सेवेतील 37 कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्या सर्वांचा मनोज तालेवार, वंदना महाजन, मनीष सोनी यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, तुळशीचे रोपटे व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

निरोप समारंभातील सत्काराला उत्तर देताना मनोज तालेवार यांनी मनपाच्या सेवेतील अनुभव कथन केले. मनपाच्या शाळेत शिक्षण घेतल्यापासून आपले मनपाशी संबंध जुळले आहेत. आता अधीक्षक अभियंता पदावरून निवृत्त आहे. या काळात विविध पदांवर काम करताना चांगले काम करता आले. संयम व प्रामाणिकपणा राहिला तर आयुष्यात अनेक कामे सोपे होते व मनपात काम करणेही सुकर होत असल्याचे त्यांनी सांगितले. आयुष्याच्या या टप्प्यावर सेवानिवृत्तांनी आपले उर्वरित आयुष्य चांगले घालवावे व त्यासाठी चांगले आरोग्य आपल्याला लाभावे, अशा शुभेच्छांही त्यांनी दिल्या.
यावेळी बोलताना जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी म्हणाले, आपण आयुष्याचा मोठा काळ मनपामध्ये घालविला आहे. आता आयुष्याचा दुसरा डाव सुरू होणार आहे. या काळात जे आपल्याला करता आले नाही. ते आता नव्या डावात करता येईल. यासाठी त्यांनी सर्वांना निरामय आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.





