काटोल :- शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख तथा जागता राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद (पिंटू) देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी ७ ऑगस्ट रोजी काटोल येथे भव्य रोजगार मेळावा तसेच मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम सकाळी १० वाजता लक्ष्मीकमल भवन, पंचवटी, काटोल येथे पार पडणार असून, रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक- युवतींसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर, अभियंता तसेच फ्रेशर्स व अनुभवी उमेदवारांसाठी विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांमध्ये थेट मुलाखतीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रोजगार मेळाव्यात मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल, आयटी व बीपीओ, बँकिंग व फायनान्स, हॉस्पिटॅलिटी, हेल्थकेअर, रिटेल, लॉजिस्टिक्स, वेअरहाऊस, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, डिजिटल सेवा आदी विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. महाराष्ट्रातील अनेक आघाडीच्या कंपन्यांकडून उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार असून, पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
यासोबतच सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी, सल्ला व आवश्यक मार्गदर्शन दिले जाणार आहे. नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या रोजगार मेळाव्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, बायोडाटा व ओळखपत्रासह उपस्थित राहावे, तसेच अधिकाधिक युवक- युवती व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मिलिंद (पिंटू) देशमुख मित्र परिवार व जानता राजा प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.





