हंसराज,भंडारा :- “भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा विकास आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे ही आमची प्राथमिकता आहे. धान बोनस असो किंवा समृद्धी महामार्गासाठी होणारे भूसंपादन, शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही,” अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांनी येथे दिली.
खासदार प्रफुल पटेल भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नवनियुक्त खासदार राजेंद्र जैन, आमदार राजू कारेमोरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकरी प्रश्नांवर लक्ष जिल्ह्यातील पावसाच्या परिस्थितीवर समाधान व्यक्त करताना पटेल म्हणाले की, विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत भंडाऱ्यात पावसाची स्थिती बरी आहे. धानाच्या बोनसबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला धान बोनस शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावा यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तसेच, कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती जिल्हा बँकांच्या अध्यक्षांनी दिल्याचे त्यांनी नमूद केले.
रस्ते विकासाचा आढावा जिल्ह्यातील रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गांच्या कामाबाबत पटेल यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “मी स्वतः, खासदार राजेंद्र जैन आणि आमदार राजू कारेमोरे यांनी दिल्लीत रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि ‘न्हाई’च्या (NHAI) अधिकाऱ्यांची भेट घेतली. यामध्ये भंडारा शहराचा बायपास, तुमसर शहराचा बायपास आणि भंडारा-खापा-बालाघाट या महामार्गाच्या कामावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. तसेच, भंडारा शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गाचे चौपदरीकरण आणि सर्व्हिस रोडचे कामही वेगाने मार्गी लावले जाईल.”
समृद्धी महामार्ग विस्तार आणि मोबदला नागपूर-भंडारा-गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्याबाबत मुंबईत आढावा घेण्यात आला आहे. मात्र, या प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत प्रफुल पटेल यांनी सांगितले की, “मी स्वतः एमएसआरडीसीचे एमडी गायकवाड यांच्याशी चर्चा केली असून, लवकरच जिल्हाधिकारी आणि आयुक्तांशी बोलून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून दिला जाईल. विकास कामांसाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, पण त्यांच्या हक्काचा मोबदला त्यांना मिळालाच पाहिजे, यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत.”
या पत्रकार परिषदेला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





