– वरठी येथे १० गोवंशाची सुटका; आरोपी चालक फरार
हंसराज,भंडारा :- जिल्ह्यातील जनावरांची अवैध वाहतूक आणि त्यांना दिली जाणारी क्रूर वागणूक याविरोधात भंडारा जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धाड टाकून १० गोवंशाची सुटका केली असून, एकूण ८ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरठी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनातून (क्रमांक एम.एच. ४०/सी.टी. ३०८४) जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सदर वाहनावर रेड केली असता, पोलिसांना पाहून चालक घटनास्थळावरून फरार झाला.
अत्यंत निर्दयीपणे केली जात होती वाहतूक वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये १० गोवंश जातीची जनावरे अत्यंत निर्दयीपणे दाटीवाटीने कोंबून भरलेली आढळली. नियमानुसार प्रत्येक जनावरासाठी २ बाय २ मीटर जागा असणे बंधनकारक असताना, या वाहनात पुरेशी जागा उपलब्ध नव्हती. जनावरांना आखूड दोरीने घट्ट बांधून ठेवले होते आणि त्यांच्यासाठी चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. ही जनावरे कतलीच्या उद्देशाने नेली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
८.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त या कारवाईत पोलिसांनी १ लाख ४७ हजार रुपये किमतीची एकूण १० जनावरे (ज्यामध्ये गाई आणि गोऱ्यांचा समावेश आहे) आणि ७ लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहन, असा एकूण ८ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आहे.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम १९६० आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ (सुधारणा २०१५) च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. साठवणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास वरठी पोलीस स्टेशन करत आहे.





