– संजय राऊत यांचा सरनाईक यांना इशारा
मुंबई :- रॅपिडोसाठी रिक्षाचालकांची रोजीरोटी हिरावून घेतली जात आहे. या रिक्षाचालकांना वाऱ्यावर सोडलं जात आहे. त्यांच्या प्रश्नांसाठी मी तुमच्याकडे वेळ मागितली आहे. तुम्ही आम्हाला वेळ द्या. रिक्षाचालकांच्या समस्या जाणून घ्या. उलट आरोपप्रत्यरोप करू नका. आव्हानं देऊन नका. नाही तर तुम्हीच अडचणीत याल, असा इशाराच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिला आहे. संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते.
प्रताप सरनाईक हे महाराष्ट्रातील धर्मात्मा आहेत आणि ते राज्याचे परिवहन मंत्री आहेत. नाशिक आणि इतर भागातील संघटनांनी माझ्याकडे जी कागदपत्रे दिली त्यानुसार सरकारमधील काही मंत्र्यांना रॅपिडोने विविध मार्गाने उपकृत केलं आहे. त्यांची सार्वजनिक मंडळ, दहीहंड्या यांना रॅपिडोवाल्यांनी प्रायोजक म्हणून पैसे दिले आहेत. या इंटरेस्टला कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणतात. ठाण्यातील दहीहंडीतही स्पॉन्सरशीप मिळाली आहे. ज्या रॅपिडो कंपनीला गरीब रिक्षाचलाकांच्या छाताडावर बसवलं आहे, त्या रॅपिडो कंपनीने परिवहन मंत्र्यांची दहीहंडी स्पॉन्सर केली आहे. इतर मंत्र्यांना स्पॉन्सर केलं आहे. हा मुद्दा समोर येत असेल तर रिक्षा चालकांचं समाधान करणं हे परिवहन मंत्र्यांचं काम आहे. त्यांनी त्यांच्याशी बोलावं. परिवहन मंत्र्यांना रॅपिडो बरोबर बैठक घ्यायला वेळ आहे. पण मराठी रिक्षाचालकांशी बोलायला वेळ नाही. आव्हानं देऊ नका. आम्ही जे सांगतो त्यावर बोला, नाही तर तुम्ही अडचणीत याल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.





