– कार्तिक पौर्णिमेला होणार समारोप
बेला :- जवळच्या मोहगाव येथील बुद्ध विहारात आषाढी पौर्णिमा म्हणजे २५ जुलैपासून बौद्ध संस्कृती व तथागत गौतम बुद्धांच्या धम्मपरंपरेनुसार ‘वर्षावास कार्यक्रम उत्साहात सुरू आहे. स्थानिक स्त्री पुरुष युवक युवती आदी उपवासाकांनी वर्षावासात श्रद्धेने सहभाग घेतला आहे.
वर्षावासाच्या कालावधीत बुद्ध विहारात नियमितपणे बुद्ध वंदना, धम्म वंदना व संघ वंदना घेण्यात येत असून, उपासक-उपासिकांकडून तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनावर, विचारांवर व धम्मावर आधारित ग्रंथ व कादंबऱ्यांचे दररोज वाचन केले जात आहे. या उपक्रमामुळे गावातील नागरिकांमध्ये धम्मविचार, वाचनाची आवड, शिस्त, बंधुभाव आणि सामाजिक एकोपा वाढण्यास मदत होत आहे. वर्षावासात गावातील ज्येष्ठ नेते वसंत कांबळे, बाबाराव कांबळे, नीलकंठ गोडघाटे, सामाजिक कार्यकर्ते अमित मून, कमल कांबळे, उषा कांबळे, माजी उपसरपंच अनिता कांबळे, शालिनी गोडघाटे, शोभा बाबळे, बैन गोडघाटे, वेणु पोहणकर यांच्यासह अनेक बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घेत आहे.
वर्षावास हा केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित न ठेवता धम्माचे अध्ययन, आत्मचिंतन, सदाचार, करुणा, मैत्री, प्रज्ञा आणि सामाजिक बांधिलकी वाढविण्याचा काळ म्हणून साजरा करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. बुद्ध विहार हे गावातील शांतता, समता आणि सकारात्मक विचारांचे केंद्र बनावे,अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
मोहगाव येथील या उपक्रमामुळे समाज बांधव बुद्ध विहारातून शांतता, धम्मातून प्रबोधन आणि आचरणातून समाजपरिवर्तनाचा संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न करत आहे.





