दिल्ली 8 – भाजप व निवडणूक आयोगात संगनमत झाल्याचा गंभीर आरोप करत, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दावा केला आहे की, बेंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघातील महादेवपूरा विधानसभा क्षेत्रात तब्बल १,००,२५० फसव्या मतदारांची नोंद करण्यात आली. हे सर्व मत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जिंकवण्यासाठी वापरण्यात आले, असा आरोप त्यांनी गुरुवारी (७ ऑगस्ट २०२५) रोजी केला.
राहुल गांधी यांनी पाच मार्गांनी मतांची चोरी झाल्याचे म्हटले – डुप्लिकेट मतदार, खोटे किंवा अवैध पत्ते, एका पत्त्यावर मोठ्या संख्येने मतदार, अवैध फोटो, आणि फॉर्म ६ चा गैरवापर. त्यांनी नमूद केलं की काँग्रेसने या भागातील सातपैकी सहा विधानसभा जागा जिंकल्या, परंतु महादेवपूरामध्ये भाजपने १,१४,०४६ मताधिक्याने विजय मिळवला – जी त्यांच्या एकूण विजयासाठी निर्णायक ठरली.
सुसंगत पुरावे सादर करा – ईसीआयची मागणी
कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी राहुल गांधींना शपथपत्रावर आधारलेले पुरावे मागवले आहेत, जेणेकरून आवश्यक ती कारवाई करता येईल. त्यांनी सांगितले की, “मतदार नोंदणी नियम १९६० अंतर्गत, कृपया नावांसह घोषणा/शपथपत्र सादर करा.”
राहुल गांधी यांचे उत्तर
गांधी यांनी उत्तर देताना सांगितले की, “मी लोकांसमोर बोलतो, तेच माझं वचन आहे. हे मी जाहीरपणे सांगतो आहे – हीच माझी शपथ समजा. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाने या माहितीचा इन्कार केलेला नाही.”
विरोधकांचा संशय व भाजपचा पलटवार
उत्तर प्रदेश व महाराष्ट्रच्या निवडणूक आयोगांनी काही नमूद केलेल्या मतदारांची नोंद फेटाळली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत म्हटलं – “राहुल गांधींची आकडेवारी सतत बदलते. एकदा ते म्हणतात ७५ लाख मतदार वाढले, नंतर म्हणतात १ कोटी. मी म्हणतो, त्यांच्या मेंदूची चिप चोरीला गेली आहे, हार्ड डिस्क करप्ट झाली आहे.”
काँग्रेसने सादर केलेली आकडेवारी
गांधी यांच्या म्हणण्यानुसार:
- ११,९६५ डुप्लिकेट मतदार
- ४०,००९ फसव्या किंवा अमान्य पत्त्यावरील मतदार
- १०,४५२ एकाच पत्त्यावर असलेले बॅल्क मतदार
- ४,१३२ अवैध फोटो
- ३३,६९२ मतदारांनी फॉर्म ६ चा दुरुपयोग केला
उदाहरण देताना गांधी म्हणाले की, गुरकीरत सिंग डांग या व्यक्तीचे चार वेगवेगळ्या केंद्रांवर मतदार म्हणून नोंद झाली असून चार वेगवेगळ्या EPIC क्रमांकांसह त्याची नोंद आहे. आदित्य श्रीवास्तव हे नाव वाराणसी, मुंबई आणि बेंगळुरू – तिन्ही ठिकाणी मतदार यादीत आहे.
‘एक मतदार, एक मत’ तत्त्वाची पायमल्ली
गांधी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना इशारा देत सांगितले – “विरोधक एक दिवस सत्तेत येतील आणि तेव्हा तुमचं काय होईल हे तुम्ही पाहाल. तुम्ही भारताच्या लोकशाहीच्या पायाावर हल्ला करत आहात.”
विरोध मार्च
या प्रकरणावरून शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांची मागणी
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा देण्याची मागणी केली असून सरकार बरखास्त करण्याचे आवाहन केले आहे.




