spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणांवर थेट संवाद

– उच्चस्तरीय समितीसमोर पूर्व विदर्भातील परीक्षार्थींनी मांडल्या अडचणी, अपेक्षा व सूचना

नागपूर :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासह राज्यातील शासकीय भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह आणि उमेदवारकेंद्रीत करण्याच्या दृष्टीने बुधवारी पूर्व विदर्भातील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात आला. सदर येथील जिल्हा नियोजन भवनात उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्ष तथा अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा आणि इतर सदस्यांनी हितधारकांच्या अडचणी, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या. या संवाद कार्यक्रमाला पूर्व विदर्भातील स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक व नागरिक उपस्थित होते.

राज्याचे पोलीस महासंचालक तथा समितीचे सदस्य सदानंद दाते, समितीचे सदस्य सचिव तथा पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, आयआयटी मुंबईचे प्रा. श्यामप्रसाद करगड्डे, नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी प्रत्यक्ष तर इलेक्ट्र्रॅानिक्स, माहिती-तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह तसेच संघ लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य एअर मार्शल अजित भोसले दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

राज्य सरकारने भरती परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. या समितीच्या माध्यमातून परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी दूर करून उमेदवारांना अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने परीक्षा देता यावी, तसेच भरती प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, यासाठी विविध घटकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नागपुरात विद्यार्थ्यांसोबत हा संवाद आयोजित करण्यात आला.

एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित विविध मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. परीक्षांचे वेळापत्रक, परीक्षा केंद्रांची उपलब्धता, अभ्यासक्रमातील बदल, प्रश्नपत्रिकेची गुणवत्ता, परीक्षा आयोजनातील पारदर्शकता, निकाल जाहीर करण्यास लागणारा कालावधी तसेच भरती प्रक्रियेतील विविध टप्प्यांबाबत विद्यार्थ्यांनी सूचना केल्या. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या अपेक्षाही यावेळी उच्चस्तरीय समितीसमोर मांडण्यात आल्या.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा प्रक्रियेत सहभागी होताना येणाऱ्या अडचणी, परीक्षा केंद्रांचे नियोजन, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, उमेदवारांना वेळेवर माहिती उपलब्ध करून देणे आदी विषयांवरही विद्यार्थ्यांनी चर्चा केली. परीक्षा प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही विद्यार्थ्यांकडून सूचना घेण्यात आल्या.

उच्चस्तरीय समितीच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या सूचना जाणून घेतल्या. केवळ प्रशासकीय पातळीवरून परीक्षा पद्धतीत बदल करण्याऐवजी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे अनुभव आणि प्रत्यक्ष अडचणी समजून घेण्याच्या दृष्टीने हा संवाद महत्त्वाचा ठरला.

नागपूरसह पूर्व विदर्भातील विविध भागांतून मोठ्या संख्येने विद्यार्थी या संवाद कार्यक्रमासाठी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांनी परीक्षा पद्धती अधिक कार्यक्षम आणि उमेदवारांना अनुकूल करण्यासाठी आपल्या सूचना मांडल्या. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध मुद्द्यांची उच्चस्तरीय समितीने नोंद घेतली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.