नागपूर ११ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे की राज्य सरकारने नागपूर ते मुंबई दरम्यानच्या समृद्धी महामार्गालगत एक हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने हालचाली सुरू असून नुकतेच एक प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. फडणवीस म्हणाले, “समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रासाठी जीवनवाहिनी ठरतो आहे. त्याच्याबरोबरच हाय-स्पीड ट्रेनची जोड दिल्यास नागपूर ते मुंबई हा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायक होईल.” रेल्वे मंत्रालयाच्या सर्वेक्षणादरम्यान काही तांत्रिक व भौगोलिक अडचणी समोर आल्या असून, त्या राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नांद्वारे सोडवण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी नागपूर रेल्वे स्थानकावर अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी नागपूर-मुंबई हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाची माहिती दिली. या प्रकल्पाच्या दृष्टीने फेब्रुवारी २०२२ मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले होते की, प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. या ट्रेनचा वेग ताशी ३०० किमी पर्यंत असणार असून, नागपूर ते मुंबई हा प्रवास अवघ्या ४ तासांत पूर्ण होईल, असेही तेव्हा सांगण्यात आले होते. ही हाय-स्पीड ट्रेन अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असेल आणि मार्गामध्ये काही प्रमुख स्थानकांनाही जोडले जाईल. हा प्रकल्प राज्याच्या विकासात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, नागपूर-मुंबई दरम्यानच्या प्रवासात क्रांतिकारी बदल घडवू शकतो.
समृद्धी महामार्गाला समांतर स्पीड ट्रॅक
महाराष्ट्राचा महत्त्वाकांक्षी ‘हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ नागपूर-मुंबई दरम्यान हाय-स्पीड रोड प्रवासाचे माध्यम बनले आहे. आता त्याला समांतर हाय-स्पीड रेल्वे लाईन टाकण्याच्या योजनेमुळे, हा कॉरिडॉर एक प्रकारे ‘डबल स्पीड कॉरिडॉर’ बनू शकतो. योजनेअंतर्गत, ही ट्रेन नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा, औरंगाबाद, नाशिक मार्गे मुंबईला पोहोचेल.




