– जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन; शिवसेना पदाधिकाऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
हंसराज, भंडारा :- महायुती सरकारने अधिवेशनात दिलेल्या आश्वासनानुसार सन २०२५-२६ या वर्षाचा धान बोनस तात्काळ जाहीर करावा; अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा सज्जड इशारा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
सध्या जिल्ह्यात अपुरा पाऊस, दुष्काळसदृश परिस्थिती आणि पिकांवर पडलेला ‘खोडकिडा’ रोग यामुळे धान उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बोनस देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. कर्जमाफीचे लाभही अटी-शर्तींमुळे शेतकऱ्यांच्या हाती न पडल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ बोनस जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन सादर करतेवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, तालुकाप्रमुख तिलक सार्व्हे, शहर प्रमुख राकेश आग्रे, शहर संघटक मयूर जोशी, प्रशांत देशमुख, उपतालुकाप्रमुख गुरुदेव साकुरे, उपशहर प्रमुख प्रकाश गभणे, राजेश ठवकर, विभाग प्रमुख अनिरुद्ध गाढवे, नितेश गभणे, क्रिष्णा नागपुरे, हिमांशू भाजीपाले, संतोष चांदेवार, रोशन दहेलकर, शामराव मालखंडाळे, निलेश चामट आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती कृषिमंत्री, आ. अंबादास दानवे व आ. अनिल परब यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.





