नागपूर १८ : नागपूरमधून समोर आलेले हे प्रकरण पोलीस यंत्रणेच्या प्रामाणिकतेवर काळा डाग आहे. बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीवर योग्य ती कारवाई करणे अपेक्षित असताना, त्याच आरोपीकडून कस्टडीत असताना सोन्याचे दागिने हिसकावून घेतल्याचा आरोप समोर येणे ही बाब केवळ धक्कादायक नाही तर लोकशाहीतील न्यायव्यवस्थेची थेट थट्टा आहे. न्यायालयाने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत हे स्वागतार्ह आहे, पण यामुळे पोलिसांवरील अविश्वासाचा भस्मासुर आणखीच बळावला आहे.
पोलिस म्हणजे कायद्याचे रक्षक की लुटारू? आरोपींना कस्टडीत ठेवणे म्हणजे कायद्याच्या प्रक्रियेतून त्याला शिक्षा देणे. पण जर कस्टडीत असताना पोलिसच “मारहाणीचे भय दाखवून” सोन्याचे दागिने हिसकावतात, तर हा प्रकार गुन्हेगारांच्या टोळ्यांपासून वेगळा कुठे राहतो? पोलिस गणवेशाच्या आडून जर चोरी, खंडणी आणि शोषण होत असेल, तर मग नागरिकांनी विश्वास कुणावर ठेवायचा?
ही घटना एकट्याची नाही; अशा प्रकारच्या तक्रारी अधूनमधून समाजात डोकं वर काढतात. मात्र, बहुतेक वेळा त्या झाकल्या जातात किंवा औपचारिक चौकशीच्या नावाखाली दडपल्या जातात. जर या प्रकरणातही तसंच झालं, तर नागपूरच्या पोलीस व्यवस्थेची प्रतिमा पूर्णपणे धुळीस मिळेल. गुन्हेगारांच्या टोळीशी जर पोलिसांचं वर्तन सारखं दिसू लागलं, तर कायदा कुठल्या तोंडाने न्यायदान करणार?
आजचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे – पोलीस कस्टडी कितपत सुरक्षित आहे? आरोपी असो वा सामान्य नागरिक, प्रत्येकाला न्याय मिळणं ही लोकशाहीची हमी आहे. पण पोलिसांनीच कस्टडीचा गैरवापर करून स्वार्थ साधला तर हा हमीपत्रच जळून खाक होईल.
या प्रकरणाची चौकशी ही केवळ औपचारिक राहून चालणार नाही. दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर पोलिस दलावरील नागरिकांचा उरलेसुरलेला विश्वासही कोसळेल. नागपूरच्या या घटनेने स्पष्ट केले आहे की पोलिस व्यवस्थेत शिस्त, उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेची शस्त्रक्रिया करणे आता अपरिहार्य झाले आहे.




