“कलावंताच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन” – राजे मुधोजी भोसले
“माझे जीवन कलावंतांसाठी समर्पित” – शाहीर डॉ. राजेंद्र बावनकुळे
कामठी २३ – दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कामठी शहरातील श्रीराम जानकी मंगल कार्यालयात भारतीय कलाकार शाहीर मंडळ (ऑल इंडिया) यांच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त भव्य दिव्य शाहीर कलाकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराजा ऑफ नागपूर राजे मुधोजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या सत्तर वर्षांपासून ग्रामीण आणि उपेक्षित भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या संस्थेच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला. कार्यक्रमात भजन, कीर्तन, पोवाडे, डाहका, खडिगमत अशा पारंपरिक लोककला सादर करण्यात आल्या. समाज प्रबोधनाचे माध्यम म्हणून कलावंतांनी प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.
राजे मुधोजी भोसले यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, “ही कला आपल्या संस्कृतीची शान आहे. ती जपण्यासाठी आणि कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे.” यावेळी शाहीर डॉ. राजेंद्र भीमराव बावनकुळे यांनी लोकशाहीर वसंत भीमराव बावनकुळे यांच्या कार्याची आठवण करून देत सांगितले की, “त्यांच्या प्रेरणेतून मी शाहीर कलावंतांच्या न्यायासाठी मोर्चा, उपोषण, आंदोलने करून लढा दिला आहे आणि माझे जीवन या कार्यासाठी समर्पित आहे.”
कार्यक्रमात शाहीर डॉ. राजेंद्र बावनकुळे यांच्या हस्ते कलाकारांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि पत्रकारांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला शिवसेनाचे ज्येष्ठ नेते राधेश्याम हटवार, तेजस बहुउद्देशीय संस्थाचे संस्थापक चंद्रशेखर अरगुल्लेवार, गव्हर्नमेंट पॉलिटिक कॉलेजचे प्रा. नितीन पाटील, डॉ. शाहीर शंकर भोंगेकर, राष्ट्रीय कव्वाल अनिरुद्ध शेवाळे, कवित्री मंजूताई कारेमोरे, डॉ. मनीषा ठाकरे, डॉ. जय रामटेके, कवी ज्ञानेश्वर वांढरे, शाहीर पुरुषोत्तम खांडेकर, शिवराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक पंकज नलेंद्रवार, माजी भाजप अध्यक्ष चंद्रशेखर तुप्पंट, विमल शिवारे, भागवत शहारे, संजय काळे, विनायक नागमोते, शाहीर अंबरदास पाहुणे, अमरावती येथील अशोक घुमरे, विशाल बेलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाहीर भगवान लांजेवार, विक्रम वांढरे, ब्रह्म नवघरे, गजानन वडे, भूपेश बावनकुळे, छगन बावनकुळे, वीरेंद्र सेंगर, गजानन सातनुरकर, नितीन लांजेवार, नत्थू चरडे, रविंद्र मेश्राम, युवराज अडकणे, पत्रकार सुनील सरोदे, सौ. अरुणा बावनकुळे, वंदना घुमडे, रेखा दोरखेडे, प्रतिभा कुंभलकर यांच्यासह अनेकांनी अथक परिश्रम घेतले.




