भंडारा :- भारत आणि अमेरिका यांच्यामधील प्रस्तावित अंतरिम व्यापार कराराच्या विरोधात आज भंडारा तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. या करारामुळे देशातील शेतकरी, लघुउद्योग, छोटे व्यापारी, कामगार, युवक व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, भारत हा कृषिप्रधान देश असून लाखो शेतकरी शेती व संबंधित व्यवसायावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत परदेशी कृषी उत्पादनांना भारतीय बाजारपेठ खुली केल्यास स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पादन दर कोसळून मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, कापड उद्योग, किरकोळ व्यापार व लघुउद्योग क्षेत्रावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
बहुराष्ट्रीय कंपन्यांना प्रोत्साहन मिळाल्यास देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग संकटात येतील, बेरोजगारी वाढेल व युवकांच्या रोजगार संधी कमी होतील. विदेशी वर्चस्वामुळे देशाच्या आर्थिक स्वावलंबनावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. केंद्र शासनाने शेतकरी, व्यापारी, उद्योग क्षेत्र, कामगार व युवक प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करूनच कोणताही निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सदर निवेदन शासनाकडे तात्काळ पाठवून भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करारास विरोध दर्शवावा व देशातील शेतकरी, उद्योग व रोजगाराचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष पवन वंजारी, माजी तालुका अध्यक्ष बिट्टू सुखदेवे, ग्रामपंचायत सदस्य अमित हुमने, महेश मेश्राम, विजुभाऊ हटवार आदी उपस्थित होते.

