हंसराज,लाखनी :- येथील स्वर्गीय निर्धन पाटील वाघाये महाविद्यालयात थोर समाजसुधारक, लोककवी आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ.गणेश कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना कार्यकारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे म्हणाले की, “अण्णाभाऊ साठे हे केवळ एक लेखक नव्हते, तर ते एक महान समाजसुधारक, लोककवी आणि प्रखर शाहिर होते. हिंदू मातंग समाजात जन्मलेल्या या महामानवाने समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांच्या लेखणीने शोषितांच्या वेदनांना वाचा फोडली.” पुढे बोलताना त्यांनी अण्णाभाऊंच्या अजरामर ‘फकिरा’ या कादंबरीचा उल्लेख करून, त्यांच्या साहित्यातील सामाजिक क्रांतीचे विचार सर्वांनी आत्मसात करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन केले. तसेच, अण्णाभाऊंच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी समाजसेवेसाठी पुढे यावे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ. पुण्यशिल टेंभुर्णे यांनी केले. त्यांनी अण्णाभाऊंच्या जीवनातील संघर्षावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सागर वारंगणे यांनी अतिशय प्रभावीपणे केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. तुषार डोंगरवार यांनी मानले.
या सोहळ्याला महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. एस. एस. शेंडे, डॉ. सुधीर सहारे, डॉ. बबन ढोंगे, प्रा. भोयर, प्रा. वलथरे, प्रा. हलमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिक्षकेतर कर्मचारी विजय शहारे, हनवतकर, कुंभरे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि त्यांच्या जयघोषाने कार्यक्रम संपन्न झाला.





