राज्य मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल ८ मे रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि शाळा सोडण्याचा दाखला अद्याप मिळाला नाही. मात्र इयत्ता अकरावीचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला व गुणपत्रक अपलोड करणे आवश्यक आहे. राज्य मंडळाबरोबरच सीबीएसई व आयसीएससी मंडळाच्या विद्यार्थ्यांचे निकाल ऑनलाईन जाहीर झाल्याने त्यांच्याकडेही शाळा सोडल्याचा दाखला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना हमीपत्र भरून ऑनलाईन अर्ज भरावे लागत आहे.
शून्य फेरीपासून राहणार वंचित
आयजीसीएससी व आयबी मंडळाचे निकाल अद्याप जाहीर झाले नसून हे निकाल १९ मे रोजी म्हणजेच शून्य फेरी जाहीर होण्याच्या दिवशी लागणार आहेत. त्यामुळे या मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या शून्य फेरीपासून वंचित राहावे लागणार आहे.
कनिष्ठ महाविद्यालयांसमोर आव्हान
शून्य फेरी जाहीर होईपर्यंत राज्य मंडळासह सीबीएससी, आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला मिळाला नाही, तर त्यांना प्रवेश घेणे अवघड होणार आहे. कारण शाळा सोडल्याचा दाखला व मूळ गुणपत्रिका ही प्रवेशवेळी कनिष्ठ महाविद्यालयात सादर करणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना १९ मेपर्यंत दाखला आणि गुणपत्रिका न मिळाल्यास कनिष्ठ महाविद्यालयांसमोर प्रवेशासाठी संकट उभे राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.