spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सर्गिक वाळू पेक्षा कृत्रिम वाळूचा अधिक वापर व्हावा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

बचतभवन येथे कृत्रिम वाळूवर परिसंवाद

नागपूर, दि. ८ :  अलिकडच्या काळात नागरीकीकरण, शहर-महानगरांचा विस्तार, औद्योगिक वसाहती या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने स्वाभिविकच बांधकाम क्षेत्रासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी वाढली आहे. यात वाळू हा घटक पूर्णत: नैसर्गिक असल्याने त्याच्या वारेमाप उपस्यामुळे मोठ्या प्रमाणात नद्या व तिच्या परिसंस्थेला धोका निर्माण झाला. एका बाजूला वाळूची वाढती मागणी व दुसऱ्या बाजूला तिचे मर्यादित असलेले स्वरुप लक्षात घेऊन शासनाने कृत्रिम वाळूबाबत धोरणात्मक निर्णय घेतला आहे. निसर्गावर, नद्यांवर मर्यादित असलेल्या वाळूवर घाला घालण्यापेक्षा त्याच्या इतकाच बांधकामाला भक्कमपणा देणारा नैसर्गिक रेतीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

महसूल सप्ताहाच्या निमित्ताने बचत भवन येथे कृत्रिम वाळू धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, व्हीएनआयटी येथील सिव्हील विभागाचे प्रमुख प्रो. राहुल राळेगावकर, खनिकर्म उपसंचालक श्रीराम कडू, जिल्हा खनिकर्म अधिकारी  डॉ. अतुल दोड, जिल्ह्यातील विविध खदान व क्रक्षरधारक उपस्थित होते.

नागपूर जिल्ह्यामध्ये कृत्रिम रेतीसाठी लागणारा दगड मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.  ज्या-ज्या भागात शासन निर्णयानुसार दगडखाणीसाठी जागा उपलब्ध  आहे त्या ठिकाणी कृत्रिम रेती तयार करणारे एमसँड युनिट उभारले जावेत यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन त्याला चालना देण्याचे निर्देश दिले आहेत. यादृष्टीने नागपूर जिल्ह्यासाठी 50 उद्योजकांना संधी देऊ केली आहे. हे 50 उद्योजक जे प्रथम नोंदणीधारक आहे अशा 50 क्रमांकापर्यंत निवड करुन जिल्हा खनिकर्म विभाग त्यांना योग्य ते सहाय्य करेल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

कृत्रिम वाळूची गरज केवळ महाराष्ट्राची नाही तर ती जागतिक झाली आहे. पूर्वी लागणाऱ्या वाळूच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाल्यामुळे ती मागणी नैसर्गिक वाळूतून पूर्ण होणे शक्य नाही. यादृष्टीने विचार करता कृत्रिम वाळूच्या निर्मितीशिवाय इतर सक्षम पर्याय उपलब्ध नसल्याचे व्हीएनआयटीचे सिव्हील विभागाचे प्रो. राहू राळेगावकर यांनी सांगितले. जगातील अनेक संशोधकांनी कृत्रिम वाळूला प्रमाणित केले असून त्याचा अधिकाधिक वापराला चालणा देण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. हे लक्षात घेता आपण सर्वांनी कृत्रिम वाळूसाठी आग्रह धरला पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांनी प्रारंभी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन  प्रिती चुटे यांनी केले. या परिसंवादाला बांधकाम क्षेत्रातील अनेक उद्योजक उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.