किशोर साहू, मौदा :- ‘एक राखी सैनिकांसाठी’ या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथे विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्यांचे सुंदर प्रदर्शन आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने वापर करून आकर्षक व कलात्मक राख्या तयार केल्या. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी राखी बनविण्याची कृतीही प्रदर्शनात सादर केली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या संकल्पनेचा प्रभावी संदेश देण्यात आला. तसेच देशाच्या सीमेवर कार्यरत असलेल्या सैनिकांप्रती प्रेम, आदर व कृतज्ञतेची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली.

या उपक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सहशिक्षक निलेश जाधव यांचीही उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या या कलाकृतींचे कौतुक करण्यासाठी गावच्या सरपंच दर्शना बागडे, ग्रामसेवक वैभव बावनकर, उपसरपंच रामपाल धांडे तसेच विकी आस्वले, केशवराव गायधने, सुषमा बानते, सिंधू नकोरिया, सूर्यधारा रामटेके, शुभम बांते आदी मान्यवर व पालक उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व उपक्रमातील सहभागाचे कौतुक केले.





