मुंबई ११ : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र आता हवामान विभागाने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. आगामी काळात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून, नागरिकांनी अनावश्यक कामांसाठी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
या आठवड्यात, विशेषतः १३ ऑगस्ट रोजी बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे १२ ते १४ ऑगस्ट या कालावधीत राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस अपेक्षित आहे.
विदर्भ आणि कोकणासाठी ‘ऑरेंज ॲलर्ट’
- कोकण: १४ ऑगस्ट रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- विदर्भ: १३ आणि १४ ऑगस्ट रोजी गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘ऑरेंज ॲलर्ट’ जारी केला आहे. या भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
- मध्य महाराष्ट्र: मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या या इशाऱ्यानुसार, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. विशेषतः विदर्भ आणि कोकण भागातील नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
@filephoto




