हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- शहरातील गजबजलेल्या बी.टी.बी. मार्केटसमोर अवैध बाजार चिठ्ठी वसुली करणाऱ्या टोळीने एका व्यक्तीला अडवून शिवीगाळ करत लाकडी काठीने मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भंडारा शहर पोलिसांनी सात जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
संस्कार नगर, राजीव गांधी चौक येथील रहिवासी गुलाब मणीराम आंबोने (५०) हे ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास बी.टी.बी. मार्केटमध्ये भाजीपाला घेण्यासाठी आणि मित्रांना भेटण्यासाठी गेले होते. मार्केटच्या गेटसमोर ते आपल्या मित्रांशी बोलत उभे असताना, बंडू बारापात्रे व दीपक पराते यांनी अवैध बाजार चिठ्ठी वसुलीसाठी ठेवलेल्या मुलांनी त्यांना घेराव घातला.
यावेळी आरोपी चंदन प्रभाकर शेंदरे, गणेश हरीदास निनावे, शशांक धनराज सोनेकर (सर्व रा. चांदनी चौक), रवी जम्मन सोनटक्के, निशांत ऊर्फ मुन्ना दयाराम सोनटक्के, इम्रान मजीद खान आणि सुरेश डोरले यांनी संगनमत करून गुलाब आंबोने यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपी चंदन शेंदरे याने जवळ असलेल्या लाकडी काठीने आंबोने यांच्या डाव्या हातावर जोरात प्रहार केला. या हल्ल्यात आंबोने जखमी झाले असून, आरोपींनी त्यांना जीवाने मारण्याची धमकीही दिली.
फिर्यादी गुलाब आंबोने यांनी दिलेल्या तक्रारीवरून आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे भंडारा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ११८(२), १८९(२), १९१(२), १९१(३), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
बाजार परिसरात चालणाऱ्या या अवैध वसुलीमुळे आणि गुंडगिरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चोपकर हे करत आहेत.




