हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- “महापुरुषांचा अपमान… नाही सहेगा हिंदुस्तान!” अशा घोषणा देत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टीपू सुलतानशी करणाऱ्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने भंडारा येथे तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आदर्श लोककल्याणकारी राजा आहेत. अशा महान राजाची तुलना टीपू सुलतानसारख्या अत्याचारी शासकाशी करणे, हा संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि इतिहासाचा घोर अपमान आहे, अशी भावना भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
निषेध सभेत बोलताना भाजप नेत्यांनी सांगितले की, टीपू सुलतानने त्याच्या कार्यकाळात अनेक हिंदूंचे शोषण केले, सक्तीने धर्मांतरे घडवून आणली आणि निरपराध नागरिकांची हत्या केली, हे ऐतिहासिक सत्य आहे. याउलट, छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘अठरापगड’ जाती-जमातींना एकत्र करून सर्वांना समान न्याय देणारे ‘रयतेचे राज्य’ स्थापन केले. महाराजांनी सर्व समाजघटकांना सोबत घेऊन एक आदर्श शासनव्यवस्था उभी केली. अशा महान राजाची तुलना क्रूर शासकाशी करणे हे अत्यंत निंदनीय आणि संतापजनक आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या वक्तव्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राची तात्काळ जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे. माफी न मागितल्यास जनतेच्या तीव्र रोषाला आणि आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या निषेध आंदोलनाप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष आशु गोंडाने, जिल्हा महामंत्री मयुर बिसेन, कल्याणी निखाडे, भंडारा शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर, नगरपरिषद अध्यक्ष मधुरा मदनकर, चंद्रकला भोपे, रुबी चड्ढा, चैतन्य उमाळकर, मंगेश वंजारी, संदीप मेश्राम, हरिचंद मडावी, प्रदीप साठवणे, शैलेश मेश्राम, अक्षय भिवगडे, निमिष डोकरीमारे, ललित जांभुळकर, शैलेश खरोले, तुषार हट्टेवार, प्रशांत श्रावणकर, शिव आजबले, दिलीप साठवणे, सचिन तिरपुडे, नंदू राजपुरोहित, वर्षा साकोरे, नितीन गायधने, डिम्मू शेख, बल्ली पटेल, रौनक उजवणे, ज्योती साबळे, प्रियाताई खरोले, प्रशांत निंबोळकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




