spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडाऱ्यात उद्या काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह; नाना पटोलेंच्या उपस्थितीत निघणार पदयात्रा

हंसराज, भंडारा :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवार, दि. १४ जुलै रोजी दुपारी ३.०० वाजता शहरात ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.

जळाराम चौक येथील हनुमान मंदिर येथून या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. प्रारंभी मंदिरात ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन होईल, त्यानंतर हनुमान मंदिर ते गांधी चौक अशी शांततापूर्ण पदयात्रा काढण्यात येईल. गांधी चौकात सामूहिक भजन आणि प्रार्थना पार पडल्यानंतर, काँग्रेसचे शिष्टमंडळ भंडारा शहर पोलीस स्टेशन येथे जाऊन संबंधित विषयाबाबत आपले निवेदन आणि तक्रार सादर करणार आहे.

या सत्याग्रह आंदोलनाला आमदार नाना पटोले, खासदार प्रशांत पडोळे, आमदार अभिजीत वंजारी, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जि.प. अध्यक्षा कविता उके, महासचिव जिजाभाई पटेल, सचिव जय डोंगरे आणि माजी जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर यांनी सर्व तालुका व शहर काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, सेवादल आणि सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

कार्यकर्त्यांनी गांधीवादी विचारांचे प्रतीक म्हणून पांढरी टोपी आणि काँग्रेसचा दुपट्टा परिधान करून यावे, असे आवाहनही साखरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.