– स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी
हंसराज,प्रतिनिधी भंडारा लाखनी :- येथील स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासासोबतच त्यांनी दिलेला निसर्ग संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कापसे होते. मार्गदर्शन करताना त्यांनी शिवरायांच्या निसर्गप्रेमी पैलूवर प्रकाश टाकला. डॉ. कापसे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच निसर्गाचा आदर केला. त्यांचे गडकिल्ले हे निसर्ग आणि मानवाच्या सहजीवनाचे जिवंत प्रतीक आहेत. सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेले सिंहगड, रायगड आणि राजगड यांसारख्या किल्ल्यांची बांधणी निसर्गाला हानी न पोहोचवता केली गेली होती. म्हणूनच, आपणही या गडकिल्ल्यांचे सौंदर्य जपून पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनमानसात रुजवला पाहिजे.”
प्रमुख वक्ता म्हणून प्रा. सपाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली कार्याची महती सांगितली. महाराजांचे प्रशासन, युद्धनीती आणि जनकल्याणाची कामे आजही आदर्श असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे नेटके संचालन डॉ. पुण्यशील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. मंगेश कुकडे यांनी मानले. या प्रसंगी प्रा. सूर्यवंशी, प्रा. कागदे, प्रा. तितरमारे, प्रा. हलमारे, प्रा. राहानगडाले यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप ‘एकच राजा येथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर’ या पोवाड्याने आणि शिवरायांच्या जयघोषाने करण्यात आला. यामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसर शिवमय झाला होता.




