गडचिरोली :- आदिवासी समाजाला वनवासी संबोधून आदिवासींचे शोषण करणाऱ्या आर एस एस/भाजप व इतर मनुवादी संघटनांपासून सावध करुन आदिवासी समाजात जागृती निर्माण करणे व त्यांना फुले-आंबेडकरी चळवळीच्या प्रवाहात आणणे ही आंबेडकरी नेते, कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष एड डॉ.सुरेश माने यांनी केले. डॉ सुरेश माने गडचिरोली येथे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, भारतीय भागीदारी मिशन, भारतीय आदिवासी परिषद आणि आदिवासी दलित एकता परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जननायक बिरसा मुंडा शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव अंतर्गत आदिवासी जनचेतना महासम्मेलनाच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले की आदिवासी समाजात काही लोक संभ्रम निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासींसाठी काही काम केले नाही असा प्रचार करतात हा प्रचार खोडून काढण्याची गरज आहे. भारतीय संविधानात आदिवासी समाजासाठी आरक्षण व्यवस्था हेच मोठे कार्य आहे. त्यासाठी कोणीही मागणी केली नव्हती. कोणी मोर्चे काढले नव्हते. ती व्यवस्था डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केली. बिरसा मुंडा यांनी व्यवस्थेविरुध्द केलेला संघर्ष पुढे रेटून नेण्याची गरज आहे असे ही डॉ. सुरेश माने यांनी सांगितले.
याप्रसंगी डॉ. सुरेश माने लिखीत “आदिवासी – शोषण-संघर्ष, सरकारी निती, दशा – दिशा- आव्हाने या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी प्रशासकीय अधिकारी इ झेड खोब्रागडे, संभाजी सरकुंडे, रिपब्लिकन नेते रोहीदास राऊत यांनी ही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे यांनी केले तर संचालन प्रितेश अंबादे यांनी केले.




