लाखांदूर १० : लाखांदूर शहरात दिनांक ०८.०७.२०२५ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून जलमय स्थिती निर्माण झाली होती. काही भागांत तर पाणी छातीपर्यंत पोहोचले होते. या कठीण परिस्थितीतही महावितरणच्या लाईन कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता ३३/११ केव्ही परसोडी गावठाण फिडरवरील आतली ते आसोली या लाईनवर खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मोठे धाडस दाखवले.
लाखांदूर शहर विभागात वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळताच संबंधित कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. परिसरात पाणी साचलेले असूनही त्यांनी सुरक्षेची काळजी घेत, योग्य तांत्रिक तपासणी करून ब्रेकडाऊनचे कारण शोधले आणि वीज पुरवठा पूर्ववत केला. सकाळी ११.५० वाजता झालेला खंडीत विज पुरवठा संध्याकाळी १७:५० वाजता पुर्ववत केला.
या कर्मचाऱ्यांच्या समर्पणशील सेवेबद्दल स्थानिक नागरिकांनी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले. नैसर्गिक आपत्तीच्या काळातही वीज सेवा अखंड ठेवण्यासाठी हे कर्मचारी जे योगदान देतात, ते खरोखरच प्रेरणादायक आहे.
सदर वीज पुरवठा सुरळीत करण्याकरीता प्रदीप राऊत, सहाय्यक अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली विलास तुमडाम (प्रधान तंत्रज्ञ), अजय वन्नकवार (वरीष्ठ तंत्रज्ञ), हितेश सोयाम (वरीष्ठ तंत्रज्ञ), विनोद वलगाये (वरीष्ठ तंत्रज्ञ), निकेश पडोळे (वरीष्ठ तंत्रज्ञ), सुमेश जांभुळे (तंत्रज्ञ), शेलेंद्र दोनोडे (तंत्रज्ञ), धनंजय (बाहयस्त्रोत तंत्रज्ञ), कु. रश्मी भुरे (तंत्रज्ञ), संतोष रामटेके (बाहयस्त्रोत तंत्रज्ञ), प्रशांत कुत्तरमारे (वरीष्ठ तंत्रज्ञ), सुनिल कोहले (वरीष्ठ तंत्रज्ञ) यांनी परीश्रम घेतले




