यवतमाळ :- राज्यात नरबळी, अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कायदा लागू आहे. जिल्ह्यात या कायद्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले.
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक काल पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, समाज कल्याण सहायक आयुक्त मंगला मुन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी अंधश्रद्धा, नरबळी, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्याच्या जनजागृतीसाठी चांगले काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे सहकार्य घ्यावे. छ. शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात पथनाट्याद्वारे जनजागृती करावी. शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा आयोजित करुन जनजागृती करावी, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.