किशोर साहू, मौदा :- शेतकऱ्यांना सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने आधी प्रोत्साहन निधी द्यावा आणि त्यानंतरच थकीत कर्जदारांना कर्जमाफी द्यावी, अशी जोरदार मागणी मौदा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
नियमित कर्ज भरणारे शेतकरी बँकेचे हप्ते वेळेवर भरण्यासाठी नातेवाईक, मित्र किंवा खासगी सावकारांकडून उसनवारी करतात. वेळेवर कर्ज भरल्याने त्यांची पत अबाधित राहते, मात्र ही उधारी फेडताना , त्यांची मोठी आर्थिक कोंडी होते. परिणामी, पुढील हंगामातील बियाणे व खतांसाठी निधी उभारणे कठीण जाते. दुसरीकडे, थकीत कर्जदारांनाकर्जमाफीचा थेट लाभ मिळतो, ज्यामुळे प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाने प्रथम नियमित कर्जदारांसाठी स्वतंत्र प्रोत्साहन निधी जाहीर करून त्यांचा सन्मान करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
उधार-उसने पैसे घेऊन बँकेची देणी चुकावणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये. प्रथम प्रोत्साहन निधी देऊन नियमित कर्जदारांचा सन्मान केल्यास बँकिंग व्यवस्थेतही आर्थिक शिस्त निर्माण होईल.
– आनंदराव बोबडे, खंडाळा.
– वेळेवर कर्ज भरण्यासाठी खासगी ठिकाणी उधार-उसनवारी करावी लागते. नंतर ती उधारी फेडताना नाकीनऊ येतात. त्यामुळे शासनाने प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्यांना प्रथम प्रोत्साहन निधी देऊन न्याय दिला पाहिजे.
– लाटारू बावनकुळे, नवरगाव
केवळ थकीत कर्जदारांसाठीच योजना राबवल्यास नियमित कर्ज भरणाऱ्यांत निराशा येते. नियमित कर्जदारांना प्रोत्साहन निधी दिल्यास इतर शेतकरीही वेळेवर कर्ज भरण्यास प्रवृत्त होतील.
– श्रीकांत किरपाण, पिपरी





