spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बियाणे व खते खरेदी करतांना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी

– कृषी विभागाचे आवाहन

नागपूर :- खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नागपूर विभागातील शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि किटकनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांनी उचित काळजी घेण्याचे आवाहन नागपूर विभागीय कृषी सहसंचालकांनी केले असून या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

बियाणे, खते आणि किटकनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

बियाणे, खते आणि किटकनाशके खरेदी करताना गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी देण्यास प्राधान्य देण्याचे सांगण्यात आले असून बनावट व भेसळयुक्त बियाणे, खते आणि किटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह निविष्ठा खरेदी करावी, तसेच विनापावती कोणतीही निविष्ठा खरेदी करु नये, अशी काळजी घेण्यासही सांगण्यात आले आहे.

पिकाची कापणी होईपर्यंत खरेदी केलेल्या बियाण्याचे वेष्टन/पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे शेतकऱ्यांनी जपून ठेवण्याबाबतही सूचित करण्यात आले आहे. भेसळची शंका दूर करण्यासाठी बियाण्याचे पाकिटे मोहोरबंद तथा लेबलसह असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरची अंतिम मूदत पाहून घ्यावी. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा जास्त किंमतीने कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. किटकनाशके अंतिम मूदतीच्या आत असल्याची खात्री करा.

शेतकऱ्यांना तक्रारीबाबत प्रत्यक्ष, दूरध्वनी, ईमेल, एसएमएस आदींद्वारे शासनाच्या गुणनियंत्रण अभियानात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले. कृषी निविष्ठा असलेल्या अडचणी-तक्रारी सोडविण्यासाठी तसेच मार्गदर्शनासाठी नजिकच्या कृषी विभागाशी किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० वर संपर्क साधावा.

बियाणे, खते व किटकनाशके या निविष्ठा दर्जेदार नसल्यास व यात भेसळ आढळून आल्यास तसेच बियाणे उगवणीबाबत करिता उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती शासनाने स्थापन केली आहे. शेतकऱ्यांनी आपली तक्रार पंचायत समिती व तालूका कृषी अधिकारी कार्यालयात लेखी स्वरुपात द्यावी. कापूस बियाणे व पिकांच्या संबंधात सर्व तक्रारींचे निवारण करण्याकरिता जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तसेच कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार नोंदविता येणार आहे.

एचटीबीटी आणि बीटी-3 किंवा चोर बीटी अशा अनधिकृत कापूस बियाण्यांची खरेदी शेतकऱ्यांनी करु नये, असे सांगण्यात आले आहे. शासनमान्य कापूस व इतर पिकांच्या बियाण्यांची खरेदी करावी. तसेच कृषी विभागाने शिफारस केलेल्या तणनाशकांचा वापर करावा, चोरट्या मार्गाने विक्री होणाऱ्या बियाणे, खते व किटकनाशकांची माहिती कृषी विभागास द्यावी, असे आवाहनही प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.