– आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषणकर्त्यांनी सोडले उपोषण
हंसराज, प्रतिनिधी भंडारा सिहोरा :- तुमसर-बपेरा राज्य मार्गाच्या दुरुस्तीसाठी ८ फेब्रुवारीपासून सुरू असलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या सकारात्मक दखल घेण्यानंतर स्थगित करण्यात आले. १० फेब्रुवारी रोजी सकाळीच रस्ता दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने, आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी पाजून उपोषण सोडवण्यात आले.
गेल्या ४ वर्षांपासून या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राजेंद्र बघेले आणि विनेश गजभिये यांनी ८ फेब्रुवारीपासून उपोषण पुकारले होते. ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी आमदार राजू कारेमोरे, माजी खासदार शिशुपाल पटले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन १० तारखेपासून काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले.
दिलेल्या आश्वासनानुसार, आज सकाळीच यंत्रणा कामाला लागली. यावेळी जि.प. सदस्य रमेश पारधी, राजेंद्र ढबाले, देवचंद ठाकरे, कलाम भाई शेख यांच्यासह परिसरातील सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशक्तीच्या रेट्यामुळे अखेर प्रशासनाला वाकावे लागले, अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.




