नागपूर :- कल्याण – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी अखंडपणे झटणारे, संघटित चळवळीचा पाया रचणारे आणि हजारो कुटुंबांना सुरक्षिततेचा आधार देणारे स्वर्गीय डॉ. आर. बी. सिंह साहेब हे नाव आजही प्रेरणादायी ठरते. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त त्यांचे विचार आणि कार्य आजही सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मनात जिवंत आहेत.
1978 साली त्यांनी शिक्षकेतर कर्मचारी महासंघाची स्थापना करून या क्षेत्रात संघटनात्मक चळवळीचा पाया घातला. प्राध्यापकाची मानाची नोकरी सोडून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय आणि सन्मानासाठी झटण्याचा त्यांचा निर्णय ही सामाजिक बांधिलकीची सर्वोच्च उदाहरण होती. कल्याण येथील बिर्ला कॉलेजमध्ये प्रबंधक म्हणून कार्यरत असताना त्यांनी संस्थेच्या विकासाबरोबरच अनेकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्या.
डॉ. सिंह यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या शासनदरबारी नेऊन ठोस पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार आणि पेन्शनची सुविधा मिळाली. विशेष म्हणजे 1983 पूर्वी पेन्शनचा लाभ न मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी पेन्शन योजना लागू करून हजारो कुटुंबांना निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य प्रदान केले.
तसेच त्यांनी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्याच्या लढ्यात ही यश मिळवले, ज्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार वाचले. त्यांच्या नेतृत्वात शिक्षकेतर वर्गाला समाजात योग्य प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य झाले.
स्वर्गीय डॉ. आर. बी. सिंह साहेबांचे कार्य हे केवळ संघटनेचे नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचे आंदोलन होते. त्यांच्या दूरदृष्टी, चिकाटी आणि प्रामाणिक नेतृत्वामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावले.
त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त राजा बढे, अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ यांनी त्यांना विनम्र अभिवादन करून म्हटले की, “साहेबांचे विचार आणि कार्य हे आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांनी दिलेला ‘सेवेतून समाजनिर्मितीचा मंत्र’ आमच्या प्रत्येक कृतीत मार्गदर्शक ठरेल.




