नागपूर, ०४ : भारतीय संसदेद्वारे संवैधानिक लोकशाही आणि राष्ट्र उभारणी मजबूत करण्यात शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका याविषयावर हरीयाणातील मानेसर येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेमध्ये नागपूरचे माजी महापौर दयाशंकर तिवारी, नंदा जिचकार, माजी उपमहापौर संदीप जाधव व दीपराज पार्डीकर सहभागी झाले होते. या राष्ट्रीय परिषदेला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांनी प्रामुख्याने मार्गदर्शन केले.
या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत देशभरातील विविध शहरातील महापौर आणि उपमहापौर सहभागी झाले होते. या राष्ट्रीय परिषद मध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग तसेच मध्यप्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय प्रामुख्याने उपस्थित होते. भारतीय संसदेतर्फे पहिल्यांदा या प्रकारची राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. या परिषदेमध्ये महाराष्ट्रातील ४० पेक्षा जास्त प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. या राष्ट्रीय परिषदेत विविध विषयांवर परिसंवाद झाले.
या परिषदेतील एका परिसंवादात सहभाग घेताना माजी महापौर नंदा जिचकार यांनी या परिषदांमधून लोकशाहीसोबतच देशातील स्थानिक स्वराज्य संस्था मजबूत होण्यास चालना मिळणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व महानगरपालिकांच्या बैठकीमध्ये प्रश्ननोत्तरे होत असल्याची माहिती यावेळी दिली. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी महानगरपालिकांच्या बैठकीमध्ये प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याची सूचना केली होती. महानगरपालिकांच्या बैठकांमध्ये प्रश्नोत्तरे होत असल्याने जनतेचे प्रश्न सोडविण्यास मदत होत असल्याचे दयाशंकर तिवारी यांनी यावेळी सांगितले.




